तुझ्याच जे अंतरात आहे…

काल सुरेश भटांचं “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” ऐकत होतो. त्यामध्ये दोन ओळी आल्या-

“दिलेस का प्रेम तू कुणाला,

तुझ्याच जे अंतरात आहे!”

उंबरठा चित्रपटात हे गाणं आणि या ओळी स्मिता पाटीलच्या भूमिकेतल्या पात्राचं मनोगत असतीलही पण मी विचार करायला लागलो की आपल्यासाठी याचा अर्थ काय होऊ शकेल?

मग विचारचक्र जसं फिरायला लागलं तसं कळलं ही भावना विश्वव्यापी आहे!

आधीच्या पिढीतले तसेच माझ्या वेळचे ( मी पण आधीची पिढी झालो आता) सगळे लोक, मित्र सांगतात की त्यांना वडिलधाऱ्यांचा आणि विशेषतः वडिलांचा किती धाक होता..! प्रत्येकाला लहानपणी वडिलांकडून बसलेला मार ते स्वतः व्रुध्दत्वाकडे झुकले तरी स्पष्ट आठवतो.. 😄

अश्या वेळी या ओळी पुन्हा त्या ओळी आठवतात – तुझ्याच जे अंतरात आहे।

पण मग कळतं की वडील म्हणून त्यांच्या अंतरात असलेली तळमळ किती खरी होती… प्रत्येकाची आपल्या मुला/मुलीने सर्वोकृष्ट व्हावे ही खूप प्रबळ आणि प्रामाणिक ईच्छा होती आणी ती साध्य होण्यासाठी भले प्रसंगी त्याक्षणी वाईट वाटले तरी चालेल पण ती रागीट, शिस्तप्रिय प्रतिमा सोडायची नाही हाच समज किंवा निग्रह होता. या सगळ्यामध्ये अंतरात असलेलं बापाचं प्रेम कधीच उघडपणे त्यांना बोलून, व्यक्त करुन दाखवता आलं नाही.. पण प्रत्येक वडिलांच्या अंतरात सागरा एवढं प्रेम भरुन राहिलेलं असतं तरी या ओळी प्रत्येक बापाच्या काळजाला छेद देऊन जातात!

मी पण कधी कधी माझ्या मुलीला रागावतो, एखादा फटका देतो. ती रडते, माझ्यावरुन रागावून रुसून बसते, तू वाईट आहेस पण म्हणते.. पण थोड्यावेळाने जवळ येऊन “बाबा हग्ज्” म्हणते 😊

मी पण तिच्या त्या लाघवी बोलण्याने विरघळून जातो आणि तिच्या बरोबर लहान होऊन छान “hugs” देतो.. मग ती मला म्हणते “तू माझ्यावर रागावलास की मला आवडत नाहीस, पण otherwise तू मला खूप आवडतोस”.. मग मी पण तिला म्हणतो – पिल्लू यू आर माय दि मोस्ट फेवरिट पर्सन ईन धिस युनिव्हर्स!

… अशी आशा करतो की मला स्वतःला त्या वरच्या ओळींवर विचार करत बसण्याची कधी वेळ येणार नाही.

अाणि हो, मुला-मुलींनो, तुम्ही पण आई-वडिलांशी भरपूर बोला, गप्पा मारा, हसा, खेळा.. पिकनिकला जा, म्हणजे तुम्हाला पण या ओळींवर नंतर विचार करण्याची वेळ येणार नाही!

विजय

7 thoughts on “तुझ्याच जे अंतरात आहे…

  1. विजय छान लिहिले आहेस. Europe तुझ्या मधील सुप्त गुणांना वाव देत आहे. हे नक्की. 😊

    Liked by 1 person

  2. अप्रतिम. असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही पण ती ताकद दोन गोष्टीत असते. गाणं आणि लिखाण. हे वाचून थोड्या फार जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दुर्दैवानं मला फक्त १० च वर्ष सहवास लाभला. कधी कधी वाटतं आज ही एखादी कानफटात खायला आवडलं असतं. 😃😃😃
    गाते रहो और लिहिते भी.

    Liked by 1 person

  3. प्रिय मित्र विजय, सुरेश भटांच्या काव्याबद्दल काय बोलावयाचे ? जीवनातील सर्व स्थित्यंतराबद्दल त्यांनी लिहिलेले आहे, त्यावरील तुझा अभिप्राय तर खूपच सुंदर, परंतु असे होताना आता कमी दिसत आहे, आपण काळाचा महिमा वगैरे असे काही म्हणण्यात अर्थ नाही, संवाद सगळ्यांशीच साधत राहू, – मंदार

    Liked by 1 person

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.